पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधून पीएम किसानच्या १९व्या हप्त्याचे वितरण करणार
२४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधून पीएम किसान योजनेच्या १९व्या हप्त्याचे वितरण करणार आहेत. जाणून घ्या कोणते लाभार्थी याचा फायदा घेऊ शकतात
९२.८९ लाख शेतकरी कुटुंबांना लाभ
कृषी विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील ९२.८९ लाख शेतकरी कुटुंबांना या हप्त्याचे १,९६७ कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमात मुख्यमंत्री व कृषिमंत्री ऑनलाईन सहभागी
या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे नागपूरमधून ऑनलाईन सहभागी होणार आहेत. तसेच कृषी विभाग, महसूल विभाग, वन विभाग, ग्रामविकास विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांची संघटना देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.
पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे स्वरूप
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. हे अनुदान तीन टप्प्यांमध्ये म्हणजेच प्रत्येक चार महिन्यांनी २,००० रुपये या पद्धतीने वितरित केले जाते. २०१९ पासून सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत १८ हप्ते वितरित करण्यात आले आहेत आणि आता १९वा हप्ता बिहारमधील कार्यक्रमात वितरित केला जाणार आहे.
२०१९ पासून सतत मदतीचा हात
पीएम किसानच्या १८व्या हप्त्याचे वितरण वाशिममधील शेतकरी मेळाव्यात करण्यात आले होते. त्यावेळी २०,००० कोटी रुपये देशभरातील ९ कोटी ४० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. राज्यातील ९१ हजार शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळाला होता.
पीएम किसानचा हप्ता कसा तपासावा?
शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळालेला आहे का, हे तपासण्यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे. त्यानंतर:
होमपेजवरील “Farmer Corner” पर्यायावर क्लिक करा.
“Beneficiary Status” वर क्लिक करा.
रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार क्रमांक टाका.
कॅप्चा भरून “Get OTP” वर क्लिक करा.
रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका.
तुमच्या खात्यातील हप्त्याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल.
हप्ता वाढणार का? सरकारचा स्पष्ट नकार
अनेक शेतकरी पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवण्याची मागणी करत आहेत. मात्र, केंद्र सरकारने सध्या हप्ता वाढवण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता एकत्रित जमा होणार नाही, असेही राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी मोठी मदत ठरत आहे. २४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात आणखी किती शेतकऱ्यांना लाभ मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.