E-NAM Agriculture Trade – शेतकरी ते थेट ग्राहक शेतमालाची विक्री
शेती साठी प्रभावी विक्री व्यवस्था उभारण्यासाठी एका अभियानास सुरवात करण्यात येवून या अभियानाला ‘ शेत ते थेट ग्राहक ‘ असे नाव देण्यात आले. शेतक-यांना शेत ते थेट ग्राहक च्या माध्यमातून आर्थिक बळकटी देण्यासाठी शेतातील उत्पादित माल व दर्जेदार उत्पादने थेट ग्राहक पर्यंत पोहचविण्यासाठी एक यंत्रणा उभारण्यात आली.
ई-नाम म्हणजे काय
ई-नाम म्हणजे इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार (Electronic National Agriculture Market). २०१६ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ऑनलाईन राष्ट्रीय कृषी बाजाराचा शुभारंभ केला गेला. या पोर्टलच्या माध्यमातून राज्यांतर्गत व आंतरराज्य शेतकरी आपल्या शेतमालाची थेट विक्री करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना, खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना व कृषी उत्पादन संस्थांना पोर्टलवर नावनोंदणी करावी लागते. आज २७ राज्यातील व केंद्रशासित प्रदेशातील १ हजार ३६१ कृषी मंडी, १७.५ कोटी शेतकरी, लाखो व्यापारी व कमिशन एजंट या पोर्टल सलग्न आहेत.
शेतकऱ्यांना त्याचा शेतमाल योग्य पद्धतीने आणि सुस्थितीत विकता यावा यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी ६० खासगी संस्थांची करार केला आहे. या संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यापार, लॉजिस्टीक, वाहतुक, पॅकेजिंग, पिकांच्या लागवडीवेळी उपयुक्त हवामान अंदाज, फिनटेक सेवा अशा विविध सुविधा उपल्बध करून दिल्या आहेत. या विविध संस्थांच्या सोई-सुविधांच्या मार्फत शेतकरी उत्तम पद्धतीने आपल्या शेतमालाचे उत्पादन करून सोप्या पद्धतीने योग्य त्या भावात थेट विक्री करत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात सुद्धा वाढ होत आहे.
शहरी भागातील नागरिकांना मिळणा-या जिवनावश्यक वस्तु जसे – भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ , अंडी, डाळी हे खात्रीशिर व भेसळमुक्त मिळेल याची हमी नसून हमी देणारी सक्षम यंत्रणा नाही. ही यंत्रणा नसल्यामुळे आरोग्याविषयी जागरूक वर्गही याला नाहक बळी पडतो. भेसळ मुक्त वस्तु ग्राहकांना मिळत नसल्याने होणा-या दुर्धर आजाराची भिती वाढत आहे. भेसळ करुन जास्त नफा मिळवणं-या व्यापारी वर्गाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने शेतक-यांचा माल थेट ग्राहका पर्यंत पोहचत नाही ज्यामुळे शेतकरी व ग्राहकाचे नुकसान होत आहे.
केंद्र सरकराकडून स्थापन करण्यात आलेल्या ई-नाम या ऑनलाईन पोर्टलवरील कृषी उत्पादन व्यापारामध्ये आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२१ ते २०२२ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२-२३ व्यापारामध्ये तब्बल ३२% वाढ झाली असून ७४ लाख ६५६ कोटी रूपयाची उलाढाल या संपूर्ण वर्षात झाली आहे. गेल्या सात वर्षानंतर ई-नाम पोर्टलवरील व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणावर वृद्धी होताना दिसून येत आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात १ ट्रिलियन व्यापार या पोर्टलच्या माध्यमातून होईल असा अंदाज संबंधित अधिकाऱ्यांनी बांधला आहे.
यासोबतच अधिकाधिक शेतकरी, व्यापारी व शेतमाल उत्पादन संस्थासुद्धा या पोर्टलवर नावनोंदणी करण्यास पसंती देत आहेत. यामुळे राज्यातंर्गत व आंतरराज्य शेतमाल व्यापारासाठी संबंधित घटक प्रभावीरित्या या पोर्टलचा वापर करत आहेत.
ई-नाम पोर्टलवर नोंदणी कशी करायची
केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची रास्त दरात थेट विक्री करता यावी यासाठी या पोर्टलची निर्मिती केली आहे. या पोर्टलवर कोणताही शेतकरी आपली नोंदणी करून व्यापार करू शकतो. ई-नाम पोर्टलच्या या https://www.enam.gov.in लिंकववर जाऊन त्याठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसतो. त्याठिकाणी उपलब्ध असलेल्या फॉर्मनुसार आपण आपली आवश्यक ती माहिती भरून आपली नावनोंदणी करु शकतो.
ई-नाम पोर्टलचा वापर
या संकेतस्थळावर आपल्याला या ऑनलाईन पोर्टल जोडल्या गेलेल्या व्यापार घटकाबद्दल, दररोजच्या भाजीपाला व इतर धान्यांच्या दरांची रियल टाइम दर अन्य सुविधा, व्यापारासाठी राज्यानुसार दिलेल्या सुविधा अशी सर्व माहिती सविस्तर स्वरूपात मिळते. महत्त्वाचं म्हणजे या संकेतस्थळावर सर्व भाषा समाविष्ट केल्याने आपण मराठी भाषेत ही या पोर्टलचा वापर करू शकतो. त्यामुळे भाषेचा अडसर येत नाही. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पोर्टलप्रमाणे शेतकऱ्यांना मोबाईलवरून हा व्यापार हाताळता यावा यासाठी अॅपची सुद्धा निर्मिती करण्यात आली आहे. हे अॅप गूगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे.
शेतकरी आणि शेती व्यावसायिकांनी काळाची पावले ओळखून बदलत्या बाजारपेठेतील संधींचा लाभ घेतला पाहिजे. उत्पादक ते ग्राहक पुरवठा साखळी निर्माण करण्याची ही मोठी संधी आहे. काळाची गरज ओळखून ई-नाम मध्ये शेतकरी ते थेट ग्राहक शेतमालाची विक्री करता आली पाहेजे.
ई-नाम पोर्टल शेतकऱ्यासाठी का गरजेचे आहे
भविष्यात प्रगती करायची असेल तर स्वतःमध्ये बदल करावा लागेल, हे सर्व पातळ्यांवर स्वीकारले जात आहे. काळानुसार बदल न केल्याने अनेक बड्या कंपन्या कालबाह्य झाल्या. शेती व संलग्न व्यावसायिकांनाही काळाची पावले ओळखून बदल करावे लागतील. नवीन बदल स्वीकारताना, व्यवसाय सुरु करताना, भांडवल नाही, बॅंका कर्ज देत नाही अशी कारणे सांगितली जातात. कल्पकता असेल तर भांडवलाशिवाय व्यवसाय उभारता आणि यशस्वी करता येतो. हे ओला,अमेझॉन, ओयो, वॉट्सअपसारख्या उद्योगांनी दाखवून दिले आहे. कोरोनाने अनेक क्षेत्रातील त्रृटी, बलस्थाने स्पष्ट केली आहेत. त्या आधारे बदल करत, स्वीकारत पुढे जायला हवे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे शेतमालाची पुरवठा साखळी पूर्णतः विस्कळित झाली. जीवनावश्यक गोष्टींच्या पुरवठ्याचे आव्हान निर्माण झाले. अन्न पुरवठा ही प्रमुख बाब बनली. कोरोनाने शिकवलं की, तुमच्याकडे वाहन, टीव्ही, फ्रिज नसेल तरी चालेल, पण खायला अन्न पाहिजे. अन्न पुरवठा ही शाश्वत संधी असल्याचे स्पष्ट झाले.
शेतकऱ्यांनी स्वतःहून शेतमालाची प्रतवारी, पॅकिंग, ब्रॅण्डींग केले पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाला प्रतिसाद दिला पाहिजे. ई-नाम, सोशेल मिडिया वर शेतमालाच्या जाहिराती करत ब्रॅन्डिंगवर जोर देता आला पाहिजे.