सोयाबीन हमीभाव खरेदी: शेतकऱ्यांनी काय करावे?
सोयाबीनचा भाव सध्या हमीभावापेक्षा 700 ते 1000 रुपयांनी कमी आहे, तर दुसरीकडे सरकारने हमीभावावर खरेदी सुरू केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भावात सोयाबीन विकू नये असा सल्ला अभ्यासक देत आहेत. जर गरज असेल तर हमीभावावर विक्री करावी आणि जर शक्य असेल तर पुढील दोन-तीन महिने थांबावे असा अभ्यासकांचा सल्ला आहे.
आता शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की आम्हाला हमीभावापेक्षा कमी भावात सोयाबीन विकायची नाही, परंतु सरकारने सुरू केलेली हमीभाव खरेदी केंद्रे कुठे आहेत याची आम्हाला माहिती नाही. सध्या राज्यात जवळपास 478 हमीभाव खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे, त्यापैकी 371 केंद्रांवर खरेदी प्रक्रिया सुरू आहे. परंतु या खरेदी प्रक्रियेत मुख्य अडचण म्हणजे सोयाबीनमधील ओलावा. सध्या सोयाबीनमधील ओलावा 15% ते 18% दरम्यान आहे, आणि ओलावा जास्त असल्याने अनेकवेळा माल रिजेक्ट केला जातो.
सोयाबीनची खरेदी 15 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून आतापर्यंत केवळ 5000 क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. केंद्र चालक सांगतात की ओलावा कमी असलेला सोयाबीनच खरेदीयोग्य आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनचा ओलावा 12% पर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करावा.
सरकारचा उद्देश 13 लाख टन सोयाबीनची हमीभावावर खरेदी करण्याचा आहे, ज्यात पहिल्या टप्प्यात 10 लाख टन खरेदी करण्यात येईल. याच दरम्यान बाजारात सोयाबीनची आवक देखील वाढली आहे, परंतु ओलावा कमी असलेल्या सोयाबीनचे प्रमाण कमी असल्यामुळे केंद्रांवर योग्य माल कमी येत आहे.
ज्या शेतकऱ्यांना लगेचच सोयाबीन विकायची गरज नाही, त्यांना दिवाळीनंतर विक्रीचे नियोजन करणे फायदेशीर ठरू शकते. कारण सरकारच्या खरेदी केंद्रांची संख्या दिवाळीनंतर वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावात विक्री करण्याची अधिक संधी मिळू शकते.
सध्या बाजारभाव 4100 ते 4350 रुपये दरम्यान दिसत आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी हमीभावात विक्री केली तर होणारा तोटा कमी होऊ शकतो. डिसेंबरनंतर विक्रीचे नियोजन केल्यास बाजारभाव वाढण्याची शक्यता अधिक आहे. सरकारच्या खरेदी प्रक्रियेमुळे खुल्या बाजारात देखील सोयाबीनला आधार मिळू शकतो, आणि त्यानुसार भावही हमीभावाच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी या सर्व परिस्थितीचा विचार करून योग्य विक्री नियोजन करावे, ज्यामुळे त्यांचा नुकसान होणार नाही, आणि त्यांना हमीभावापेक्षा चांगला फायदा मिळू शकेल.