येसूबाई संभाजी भोसले

सन्मान कर्तृत्वाचा जागर स्त्री शक्तीचा या पर्व मध्ये आज तिसरा दिवस ह्या नवरात्री च्या तिसऱ्या दिवशी आपण आज येसूबाई संभाजी भोसले यांच्या बद्दल माहिती घेणार आहोत.

!! महाराणी येसूबाई संभाजी भोसले !!

महाराणी येसूबाई साहेब या छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी व मराठा साम्राज्याचे(स्वराज्याचे) संस्थापक  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूनबाई होत्या. त्यांचे माहेरचे आडनांव शिर्के होते. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव राजाऊ होते. छत्रपती महाराणी येसूबाई साहेब या मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहू महाराज यांच्या मातोश्री होत्या. येसूबाईसाहेबांच्या जीवनात जेवढी संकटे आली तेवढी राजघराण्यातील कोणत्याही स्त्रीवर आली नसावीत. एवढे सर्व राजवैभव असूनही आयुष्यात दुर्दैव त्यांच्या पाठीशी लागले.

संसार….तोही छत्रपती संभाजी महारांजांसारख्या सिंहाच्या छाव्याबरोबर केलेला, पती जिवंत असतानासुद्धा या पतिव्रतेला काही दिवस विधवेचे सोंग आणावे लागले ! होय, आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतींनी छोट्या संभाजीला दडवून ठेऊन अफवा पसरवली की युवराजांचा काळ आला ! त्यामुळे संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येईपर्यंत त्यांना विधवा म्हणून जगावे लागले ! मनाची केवढी प्रगल्भता इथे दिसून येते.

युवराज्ञी: “नखशिखा” हा ग्रंथ संभाजी महाराजांनी त्यांची पत्नी येसूबाई यांना श्री सखी राज्ञी जयती महाराणी ही पदवी देऊन हा ग्रंथ त्यांच्या प्रेरणेतून लिहिला. यामध्ये त्यांनी येसूबाई चा उल्लेख युवराज्ञी असा केला आहे. तसेच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याच्या कुलमुखत्यार पदाची शिक्के कट्यार येसूबाईना प्रधान केली होती. त्या स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार होत्या. कुलमुखत्यार हि पदवी खूप मोठी होती महाराज मोहिमेसाठी बाहेर गेले तर राज्याचे सर्व अधिकार हे कुलमुखत्यार असणऱ्या व्यक्तीकडे येत असत. ह्यावरून आपण समजू शकतो कि छत्रपती शिवाजी महाराजचा किती विश्वास होता येसूबाईवर.

छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याचे लचके तोडण्यास मुघलांची ५ लाखांची फौज घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात आला होता. शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्य सहजपणे ताब्यात घेता येईल हा त्याचा मनसुबा होता. पण छत्रपती संभाजी महाराज यांनी निकराने औरंगजेबाचा मनसुबा उधळून लावला. एकीकडून सिद्धी, एकीकडे पोर्तुगीज आणि एकीकडे मुघल अशी चहुबाजूंनी शत्रूंची फौज असताना छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमावर शत्रूला धूळ चारली. यात त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या सौभाग्यवती महाराणी येसूबाई यांची. सतत स्वारीवर असणाऱ्या संभाजी राजेंच्या स्वराज्याची दोर येसूबाई सांभाळत होत्या. न्यायनिवाडा पासून ते स्वराज्याचा सांभाळ त्या जोमाने करत होत्या. स्वराज्यातील काही मंडळी आधीच संभाजी महाराज यांच्या विरोधात होती. त्यात त्यांच्यावर विषप्रयोग सुद्धा झाले होते. यात येसूबाई यांनी संभाजी महाराज यांना निकराची साथ दिली. संभाजी महाराज गडावर नसताना सुद्धा गडावर कोणतेही राजकारण त्यांनी शिजू दिले नाही.

इ.स. १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या कैदेत सापडले. रोज संभाजी महाराज यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या येसूबाई यांना येत होत्या. त्यांनी स्वतःला सांभाळत स्वराज्य संरक्षण यावर लक्ष दिले. मराठ्यांचे मनोधैर्य खचू नये याची त्यांनी काळजी घेतली. अखेर ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले. महाराजांच्या हत्येनंतर न खचता महाराणी येसूबाई खंबीरपणे उभ्या राहिल्या. महाराणी येसूबाई यांच्या कर्तृत्वाला आणि त्यागाला इथेच सुरुवात झाली. आपल्या पतीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेऊन त्यांनी स्वराज्याची विसकटलेली घडी सरळ करायला सुरुवात केली.

येसूबाई यांचे यांच्या मनाचा मोठेपणा आणि चातुर्यामुळे संभाजी महाराज गेल्यानंतर सुद्धा स्वराज्य नांदत राहिले. नियमाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शाहू राज्यावर बसावयास हवा होता. परंतु शाहू महाराज लहान होते. महाराणी येसूबाई यांनी आग्रह केला असता तर छोट्या शाहूला राज्याभिषेकही झाला असता. पण तत्कालीन परिस्थिती पाहता त्यांच्या लक्षात आले की स्वराज्य टिकवायचे असेल तर मुलाच्या प्रेमापेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे. त्यांनी पुत्रप्रेम बाजूला सारून आपल्या पुत्रसमान दीर राजाराम महाराज यांना गादीवर बसवले व स्वतः त्यांच्या वतीने काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या स्वार्थत्यागामुळे सर्व मराठा सरदार एकत्र राहिले शत्रू साबोत लडत राहील.

महाराणी येसूबाई यांचा त्याग इथेच संपत नाही. उलट तो त्याग इथे सुरू होतो. त्यांच्या असीम त्यागाचे दुसरे उदाहरण तर इतिहासात अजरामर असेच म्हणावे लागेल. छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारल्यावर औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. त्याने स्वराज्याचा घास घेण्यासाठी झुल्फिकारखान ला रायगडाला वेढा देण्यास पाठविले. पण स्वराज्याचा धनी त्या वेढ्यात अडकून पडला असता तर सैन्याला एकत्र आणणार कोण हा प्रश्न होता. तसेच बाहेर मोकाट असलेल्या औरंगजेबाच्या सैन्याने चहूबाजुनी आक्रमण करून स्वराज्याचे लचके तोडले असते. आणि राजाच बंदीवान असल्याने राज्यकारभार हाकणे हे अवघड झाले असते.

येसूबाईंची त्यावर उपाय काढला. त्यांनी राजाराम महाराजांना सुचवले की त्यांनी रायगडच्या वेढ्यातून बाहेर पडून जिंजीच्या किल्यात तळ ठोकावा व रायगड वेढ्यात अडकल्याने संपूर्ण राजधानीच जिंजीला हलवावी. स्वराज्याचा खजिना मुघलांच्या हाती पडता कामा नये अशी सोय करावी, असे केल्याने रायगडाचे महत्व कमी होऊन या वेढ्यातून औरंगजेबाला फारसे काही गवसणार नाही आणि स्वराज्याचा कारभार व्यवस्थित हाकता येईल. म्हणजे स्वराज्य राखण्यासाठी त्या स्वतःला तोफेच्या तोंडी द्यायला तयार होत्या. कल्पना बिनतोड होती पण आपल्या मातेसमान वहिनीला आणि छोट्या शाहूला वेढ्यात एकटे सोडून निघून जाणे हे राजाराम महाराजांना पटत नव्हते. पण येसूबाईंनी “राजाने नात्यांपेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे” हे त्यांना पटवून दिले. अखेर जड अंत:करणाने राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि येसूबाईंच्या सत्वपरिक्षेला सुरुवात झाली.

राजाराम महाराज रायगडावरून यशस्वीपणे निसटल्यावर येसूबाईंनी आठ महिने रायगड झुंजवला. राजाराम महाराज सुद्धा जिंजी किल्ल्यात अडकल्याने मदतीची आशा धूसर होती. खूप प्रयत्न करूनही गड ताब्यात येत नाही असे पाहून औरंगजेबाने कपट करत रायगड ताब्यात घेतला व येसूबाई ना शाहू महाराजांसहीत अटक केली. येसूबाई ना शिवरायांची शिकवणच होती की प्रसंगी गड किल्ले शत्रूला द्यावेत पण स्वराज्य राखावे. दिलेले किल्ले लढून परत मिळवता येतात पण गेलेले स्वराज्य परत मिळवता येत नाही. शत्रूने बंदी बनवले तरी सुटता येते हा इतिहासही शिवरायांनी घडवून येसूबाईंसमोर आदर्शासारखा ठेवला होता. पण दुर्दैवाने येसूबाईना त्यांच्यासारख्या युक्तीने स्वतःची सुटका करून घेता आली नाही. त्यामुळे त्यांना आपली उमेदीची एकोणतीस वर्षे स्वराज्यासाठी कैदेत व्यतीत करावी लागली.

महाराणी येसूबाई यांचा मृत्यू नैसर्गिक पद्धतीने झाला. इसवी सन १७३० मध्ये महाराणी येसूबाई यांचं निधन झालं. महाराणी येसूबाई यांची समाधी माहुली येथे कृष्णा नदीच्या काठी आहे. महाराणी येसूबाई या इतिहासातील एक कर्तबगार धाडसी महिला होत्या. त्यांनी दिलेला स्वराज्यासाठीचा त्याग नेहमीच श्रेष्ठ राहील.

!! माहिती In मराठीकडून महाराणी येसूबाई साहेब  यांना मनाचा मुजरा !!

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved