“मोटिव्हेशनल स्पीकर्सना फॉलो करण्याआधी व्यवसायाची वास्तविकता समजून घ्या”

“मोटिव्हेशनल स्पीकर्सना फॉलो करण्याआधी व्यवसायाची वास्तविकता समजून घ्या”

आता बिझनेस कोच आणि मोटिव्हेशनल बिझनेस स्पीकर्स यांना थांबवण्याची वेळ आली आहे, कारण ते तरुण पिढीला चुकीच्या मार्गाने घेऊन जात आहेत. हे लोक तरुणांना पटवून देतात की नोकरी म्हणजे गुलामी आणि व्यवसाय म्हणजे राजा होणं. व्यवसाय म्हणजे प्रचंड पैसा, श्रीमंती, आणि तुम्ही स्वतःचे मालक असता, अशी धारणा ही मंडळी निर्माण करत आहेत. हे सगळं ते का करतात? कारण त्यांना रील्स आणि व्हिडीओ व्हायरल करून त्यातून चांगले उत्पन्न कमवायचे असते. ते फक्त तरुणांच्या भावना खेळवतात आणि व्यवसायाचे स्वप्न विकतात, पण संपूर्ण चित्र कधीच दाखवत नाहीत.

नोकरी म्हणजे फक्त गरज पूर्ण करण्यासाठी असते, ती गुलामी आहे आणि व्यवसाय तुम्हाला स्वप्नपूर्ती आणि ऐश्वर्य देतो, असा एक भ्रम त्यांनी निर्माण केला आहे. आणि आजच्या तरुण पिढीला हा भ्रम खूप आवडतो. मागचा-पुढचा विचार न करता, कर्ज काढून किंवा घरची सगळी बचत घेवून व्यवसायात उडी घेतली जाते.

मात्र, कुठला व्यवसाय करावा, पहिली पायरी काय असावी, आणि भविष्यात तो व्यवसाय वाढवण्यासाठी काय करायला लागेल याबद्दल कोणीही विचार करत नाही, ना ते बिझनेस कोच किंवा मोटिव्हेशनल स्पीकर्स सांगतात.

तुम्ही आज पाहू शकता की गावात, शहरात, चौकात कितीतरी व्यवसाय सुरु होतात आणि लगेच बंद होतात. एखादा व्यवसाय मोठ्या धडाक्यात सुरु होतो, पण तो वर्षभरात बंद पडतो. हे सगळं का होतं? कारण व्यवसाय चालवण्यापूर्वी त्याबद्दल योग्य अभ्यास केला जात नाही. एकाने चहाचं दुकान सुरु केलं की दुसराही तेच करतो, एकाने कपड्याचं दुकान टाकलं की दुसराही त्याच मार्गावर. हेच मोबाईल शॉप्स, स्नॅक्स सेंटर इत्यादी बाबतही लागू होतं. आजकाल रील्समध्ये काहीतरी व्हायरल झालं की लोक लगेच त्याचं अनुकरण करायला लागतात.

फ्रँचायझी मॉडेल्सही आजकाल खूप लोकप्रिय झाले आहेत. काही लोकं मोठ्या रकमा घेऊन फ्रँचायझी देतात, पण व्यवसाय यशस्वी होईल याची शाश्वती मात्र देत नाहीत.

आजच्या तरुणांनी नोकरी मिळाली नाही म्हणून किंवा हवी ती नोकरी न मिळाल्यामुळे व्यवसाय सुरु करण्याचा हा प्रवाह बदलायला हवा. नोकरी जमली नाही की लगेच एखादं दुकान उघडावं असा आजचा ट्रेंड आहे. मात्र, व्यवसाय सुरु करण्याआधी त्याच्याबद्दल योग्य माहिती मिळवणं खूप आवश्यक आहे. व्यवसाय सुरु करण्यासाठी किमान १००० दिवस मेहनत द्यावी लागते. यश मिळेपर्यंत कोणत्याही प्रकारचे काम करावे लागेल, पण आजच्या तरुणांना लगेच बॉस व्हायचं असतं.नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टींचं आपलं महत्त्व आहे. कोणतीही गोष्ट कमीपणाची नाही.

व्यवसाय करताना खालील गोष्टींचा विचार करायला हवा:
  • मार्केट रिसर्च – तुमच्या व्यवसायासाठी बाजारात किती मागणी आहे, हे तपासा.
  • व्यापार योजना (Business Plan) – तुमच्या उद्दिष्टांची आणि कमाईची स्पष्ट योजना करा.
  • आर्थिक व्यवस्थापन – तुमची गुंतवणूक आणि खर्च यांचं व्यवस्थापन समजून घ्या.
  • विपणन आणि ब्रँडिंग – तुमचं ब्रँड कसं उभं करायचं याचा विचार करा.
  • कायदेशीर मुद्दे – व्यवसायाशी संबंधित सर्व कायदेशीर बाबी तपासा.
  • तंत्रज्ञान – तंत्रज्ञानाचा वापर व्यवसाय वाढवण्यासाठी कसा करता येईल ते पहा.
  • ग्राहक सेवा – चांगली ग्राहक सेवा देण्याचा प्रयत्न करा.
  • नेटवर्किंग – तुमच्या व्यवसायासाठी नेटवर्क तयार करा.

हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन, तुम्ही योग्य प्रकारे व्यवसाय सुरु करू शकता. फक्त बिझनेस कोच, मोटिव्हेशनल स्पीकर्स, किंवा युट्युब व्हिडीओ पाहून व्यवसाय सुरु करू नका. मित्र, शेजारी किंवा नातलगाने व्यवसाय सुरु केला म्हणून तुम्हीही तेच करायला नका उतरू. १००% तयारीने व्यवसायात उडी घ्या आणि कोणतीही अडचण आली तरी ती पार करण्याची जिद्द ठेवा.

आजूबाजूला अनेक लोकं चुकीच्या माहितीवर व्यवसायात उतरतात आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असतात. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सापडतील, पण त्यावर कोणीच रील्स किंवा व्हिडीओ बनवत नाही. फक्त फायद्याचं गणित दाखवतात, पण कर्ज, भांडवल, आणि मनुष्यबळ याबद्दल चर्चा होत नाही. हे सगळं ते बिझनेस कोच आणि मोटिव्हेशनल स्पीकर्स त्यांच्या फायद्यासाठी करतात.

मी असं म्हणत नाही की फक्त नोकरीच करा आणि व्यवसाय करू नका, पण व्यवसाय करताना पूर्ण माहिती आणि तयारीने करा. चुकीच्या माहितीला बळी पडू नका. जागरूक राहा, सर्व माहिती मिळवा, आणि मगच मोठे निर्णय घ्या.

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved