महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (एमजेपीजेएवाई) ही महाराष्ट्र सरकारद्वारे महाराष्ट्र राज्यातील गरीब लोकांसाठी चालवली जाणारी एक सार्वत्रिक आरोग्य सेवा योजना आहे. ही योजना 2 जुलै 2012 रोजी आठ जिल्ह्यांत (पहिला टप्पा) सुरू करण्यात आली आणि नंतर 28 जिल्ह्यांमध्ये (दुसरा टप्पा) विस्तारित करण्यात आली. 1 एप्रिल 2017 पासून योजनेचे नामकरण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे करण्यात आले. दिनांक २३.०९.२०१८ पासून आयुषमान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबरोबर एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. दिनांक ०१.०४.२०२० पासून सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजना राज्यामध्ये ई निविदा पद्धतीने निवड करण्यात आलेल्या युनायटेड इंडिया इंशुरंस कंपनीतर्फे राबविण्यात येत आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लाभार्थी
अन्न नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेल्या पिवळ्या, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.१ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न ) शिधापत्रिका धारक कुटुंबे. तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत. शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले, शासकीय वृद्धश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांची कुटुंबे
तसेच कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे हे सुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आरोग्यमित्र
सर्व अंगीकृत रुग्णालयात आरोग्य मित्र उपलब्ध आहेत.
आरोग्यमित्र रुग्णाची योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणी करतात.
तसेच रुग्णालयात उपचार घेतांना योग्य ते सहाय्य व मदत करतात.
रुग्ण नोंदणी
रुग्णांची नोंदणी आरोग्य मित्रामार्फत केली जाते.
रुग्ण नोंदणीच्या वेळी रुग्णाच्या नावाची पडताळणी त्याचे ओळखपत्र पाहून केली जाते.
ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जाणाऱ्या कागद पत्रांची यादी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र, असंघटीत कामगार ओळखपत्र किंवा ही ओळखपत्र उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका व छायाचित्रासह असणारे ओळखपत्र.
तसेच आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि 7/12 उतारा आवश्यक असतो. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं निर्धारित केलेली ओळखपत्र यासाठी ग्राह्य धरली जातात.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचार पूर्व मान्यता
या प्रकीयेमध्ये उपचारांसाठी मान्यता देण्यासाठी संगणकप्रणालीवर कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
पॅकेजनिहाय आवश्यक कागदपत्रांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मान्यता नाकारण्यात आलेले प्रिऔथ तांत्रिक समितीकडे पाठविले जातात.
तांत्रिक समितीमध्ये विमा कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी व राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य वैद्यकीय सल्लागार निर्णय देतात.
त्यांच्या निर्णयामध्ये तफावत असल्यास अश्या केसेस अंतिम मान्यतेसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सहाय्यक संचालक यांच्याकडे पाठविण्यात येतात.
ही प्रक्रिया १२ तासात पूर्ण होणे अपेक्षित आहे.
इमर्जन्सी केसेस मध्ये रूग्णालयांद्वारे Emergency Telephonic Intimation (ETI) घेतले जाते.
अशा केसेसमध्ये रुग्णांना वैध शिधापत्रिका १२० तासाच्या (कामाचे ५ दिवस) आत सादर करणे आवश्यक असते.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट रुग्णालये
या योजनेमध्ये ३० पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या शासकीय/निमशासकीय, खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रुग्णालयांची निवड काही निकषांना आधीन राहून करण्यात आली आहे.
लाभार्थी त्यांच्या इच्छेनुसार राज्यातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात उपचार घेऊ शकतो.
सध्या योजनेमध्ये खाजगी आणि शासकीय ९७३ रुग्णालये अंगीकृत आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट उपचार
योजनेंतर्गत ३४ विशेषज्ञ सेवांतर्गत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९९६ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठ्पुरावा सेवांचा समावेश आहे.
तर प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत १२०९ उपचार व १८३ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे.
एकत्रित योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सर्वसाधारण शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया, स्त्री रोगावरील शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया व उपचार, जठर व आतड्याच्या शस्त्रक्रिया व उपचार, बालरोग शस्त्रक्रिया व उपचार, मेंदू व मज्जासंस्था यांचे आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार, प्लास्टिक सर्जरी, जळीत रुग्णावरील उपचार, कृत्रिम अवयव, आकस्मिक वैद्यकीय उपचार, त्वचेच्या, सांध्याच्या व फुफफुसाच्या आजारावरील आकस्मिक उपचार, ऐनडोक्राईन, लहान मुलांचे कर्करोग, मानसिक आजार व इंटरव्हेशनल रेडीऑलोजी उपचार यांचा लाभ मिळतो.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना दावे क्लेम(Claims)
रुग्णाची रुग्णालयातून सुट्टी केल्यानंतर १० दिवसांनी आवश्यक कागदपत्रासह दावे अंगीकृत रुग्णालयाद्वारे संगणक प्रणालीवर अपलोड केले जातात.
अपलोड करण्यात आलेले दावे तपासणीसाठी टीपीए कडे येतात.
सर्व आवश्यक कागदपत्रांसह संगणक प्रणालीवर सादर करण्यात आलेल्या दाव्यांना मंजुरी देण्यात येते.
जर काही कागदपत्रे सादर केली नसल्यास दावे प्रलंबित ठेऊन रुग्णालयांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाते.
मंजूर करण्यात आलेल्या दाव्यांचे प्रदान विमा कंपनीद्वारे अंगीकृत रुग्णालयांना १५ कामाच्या दिवसांमध्ये करण्यात येते.
कोणत्याही कारणांनी दावा ना मंजूर झाल्यास पहिले अपील विमा कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या स्तरावर
तर दुसरे व अंतिम अपील मध्यवर्ती दावे समितीकडे करता येते.
तक्रार निवारण
१५५३८८ / १८००२३३२२०० या टोल फ्री नंबर वर लाभार्थी योजनेची माहिती घेऊ शकतात.
तसेच सेवेबाबत तक्रार करू शकतात.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत प्रती कुटुंब प्रती वर्ष आर्थिक मर्यादा
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष १.५० लक्ष पर्यंत विमा संरक्षण मिळते.
मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा २.५० लक्ष आहे.
प्रधान मंत्री जन आरोग्य योजना योजनेंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लक्ष पर्यंत विमा संरक्षण मिळते.
लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला किवा अनेक व्यक्तीना या योजनेचा लाभ घेता येईल.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत नि:शुल्क सेवा (Cashless Medical Service)
सदर योजनेंतर्गत लाभार्थी रुग्णास अंगीकृत रुग्णालयातून नि:शुल्क वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे.
सदर योजना पूर्णतः संगणकीकृत असून लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका
(पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी, अवर्षण ग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी)
तसेच फोटो ओळख पत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयातून मोफत उपचार घेऊ शकतात.
वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयीन उपचार, निदानासाठी लागणाऱ्या चाचण्या, आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन आणि परतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे रुग्णालयातून सुटी केल्यावर पाठपुरावा सेवा आणि १० दिवसापर्यंत गुंतागुंत झाल्यास त्याचे मोफत उपचार समाविष्ट आहेत.
कोव्हिड रुग्णासाठी २० श्वसन संस्थेचे व ICU उपचार उपलब्ध असून रुग्णास सहज उपचार मिळावेत म्हणून १० उपचारांना काही बाबीत शिथिलता देण्यात आली आहे.