कृषी पुरस्कार :-उद्यान पंडित पुरस्कार:-
महाराष्ट्राची एकूण भौगोलिक परिस्थिती, जमिनीची प्रत व हवामानातील विविधता यामुळे फलोत्पादन मोठा वाव आहे. भाजीपाला पिके, फळ पिके, फुल पिके, मसाला पिके, औषधी व सुंगधी वनस्पती पिके यापासून शेतक-यांना मोठया प्रमाणात लाभ होत आहे. फलोत्पादन क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ काम करणा-या शेतक-याला सन २००१-०२ पासून उद्यान पंडीत पुरस्कार देण्यात येतो. सदर शेतकरी हा फलोत्पादनांतर्गत यशस्वी उत्पादन, रोपवाटिका, बीजोत्पादन, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन व वापर, काढणीत्तोर व्यवस्थापन, प्रतवारी, पँकहाऊस, साठवणुक, मुल्यवर्धन, प्रक्रिया, विपणन, निर्यात इत्यादि कार्यात सहभागी होऊन उल्लेखनीय कार्य करणारा असावा. उद्यानपंडीत पुरस्कार विजेत्या शेतक-याला रु.२५,०००/- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह (ट्रॉफी), प्रशस्तिपत्र व सपत्नीक / पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार निवडीसाठी मा. मंत्री (कृषि) यांच्या अध्यक्षतेखाली अस्तित्वात असलेल्या मंत्री समिती मार्फत राज्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करण्यात येऊजन, सदर समितीने निवड केलेल्या शेतक-यास अथवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात येतो.
राज्यातून दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार संख्या – ८ (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे)
उद्यान पंडित पुरस्कार निकष-
1) शेतकरी स्वत: आधुनिक पद्धतीने फलोत्पादन पिके(फळे,भाजीपाला, फुले, मसाला पिके,सुगंधी औषधी वनस्पती इत्यादि )घेणारा असावा. शेतकरी यांचे नावे शेती असावी.चालू वर्षातील ७/१२ व ८अ वर फलोत्पादन पिकांच्या नोंदी असणे आवश्यक आहे. फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असावे.
2) फलोत्पादनांतर्गत यशस्वी उत्पादन, रोपवाटिका,बिजोत्पादन,सेंद्रीय निविष्ठा उत्पादन व वापर, काढणीत्तोर व्यवस्थापन,प्रतवारी, पैक हाऊस, साठवणूक, मुल्यवर्धन,प्रक्रिया, विपणन, निर्यात इत्यादि कार्यात सहभागी होवुन उल्लेखनीय कार्य करणारा व अधिक नफा मिळवणारा असावा.
3) आधुनिक पद्धतीच्या फलोत्पादन शेती पद्धती, काढणीत्तोर व्यवस्थापन,पणन,निर्यात इ.बाबत परिसरातील शेतकरी यांना मार्गदर्शन करणारा असावा. याबरोबरच, फलोत्पादनासंबंधी विविध स्पर्धा, प्रदर्शन, मेळावे,संशोधन संस्थांना भेटी इत्यादि उपक्रमामध्ये सहभागी होणारा आणि फलोत्पादन तंत्र प्रचार व प्रसार कार्यात सहभागी होणारा तसेच परिसरातील शेतकरी यांना अशा उपक्रमात सहभागासाठी उद्युक्त करणारा असावा.फळपीक स्पर्धा, प्रदर्शने इत्यादि मधील सहभाग/पारितोषिक इत्यादि चा तपशील प्रस्तावासोबत पुराव्यासह देण्यात यावा.
4) शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणार्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान ५ वर्ष इतके असावे.
5) संबंधिताकडून ते केंद्र/राज्य शासकीय/निमशासकीय/किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसुन किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी नसुन, सेवानिवृत्तीवेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेत नसलेबाबत स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे.
6) यापूर्वी प्रस्तुतचा पुरस्कार मिळाला असल्यास ते पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.
7) प्रस्तावासोबत मूळप्रतीतील जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयंघोषणापत्र(प्रपत्र-ई ),७/१२ ,८अ, सादर करणे आवश्यक आहे.
8) जिल्हास्तरीय समितीमार्फत शेतीस प्रत्यक्ष भेट देऊन गुणांकन व मुल्यांकन केले जाते.